अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त
हा लेख लिहिताना एक अपूर्व आनंद मनाला प्राप्त होतोय।कारणही तसेच आहे।सध्याच्या या युगात विरक्तता,निस्पृहता आढळणे खूप कठीण झाले आहे।पण ही विरक्तता,निस्पृहता कुरवपूरच्या श्री राजू गुरुजींकडे बरेच वेळेस अनुभवायला मिळाली।तसे राजू गुरुजी काही संन्यासी वगैरे नाहीत तर ते आहेत कुरवपूरचे क्षेत्रोपाध्ये।गेल्या 5 वर्षात बरेच वेळा कुरवपूरला माझे जाणे घडले आहे।कधी यात्रा घेऊन,कधी वैयक्तिक तर कधी यज्ञाच्या निमित्ताने।प्रत्येक वेळी राजू गुरुजींनी कधी एवढी दक्षिणा द्या,तेवढी दक्षिणा द्या,रूम मध्ये राहिलात त्याचे एवढे चार्जेस द्या,जेवायची व्यवस्था केली त्याचे इतके चार्जेस द्या हे कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही।आपणास योग्य वाटेल तेवढी दक्षिणा द्या किंवा दिलीच पाहिजे असेही काही नाही।आपण तृप्त झालात ना हेच आमच्यासाठी विशेष महत्वाचे आहे।मग यात्रा घेऊन गेलो असेल तर मीच ग्रुपमधील सर्वांना सांगायचो की अभिषेकाची एवढी एवढी दक्षिणा गुरुजींना देऊन नमस्कार करा।बाकी मीही गुरुजींना जेवढे देऊ तेवढे गुरुजी घ्यायचे।कमी दिलेत,एवढेच का असा ब्र शब्द ही त्यांनी कधी काढला नाही।
आता मुख्य जे सांगायचे आहे ते सांगतो।घडले असे की मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये राजू गुरुजींनी कुरवपूरच्या मंदिराचा काही भाग नूतनीकरण करण्याचा संकल्प सोडला।आलेल्या भाविकांना दर्शन व सेवा व्यवस्थित घडावी हा त्यामागचा उद्देश होता।त्यासाठी त्यांनी फेसबुकवर व व्हाट्सअप्पवर या बांधकामासाठी देणगी देण्याचे आवाहन केले होते।इंजिनियर ने या कामासाठी दहा लाख रुपयांचे बजेट दिले होते।या सव्वा महिन्यात विविध दत्तभक्तांनी राजू गुरुजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देणगी पाठवणे सुरू केले।बघता बघता फक्त एका महिन्यात हे दहा लाख रुपये जमले।आणि राजू गुरुजींनी फेसबुकवर व व्हाट्सअप्पवर 2/3 दिवसांपूर्वी परत एक आवाहन केले की बांधकामासाठी लागणारी दहा लाख ही अपेक्षित रक्कम जमलेली आहे तर यापुढे आता या कार्यासाठी कोणीही देणगी पाठवू नये।ही पोस्ट वाचून मी विस्मयचकित झालो।एवढ्या कमी कालावधीत ही रक्कम जमली यापेक्षा राजू गुरुजींनी आता कोणीही देणगी पाठवू नये ह्याने मी आश्चर्यचकित झालो।कारण बऱ्याच संस्था,ट्रस्ट किंवा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणास्तव देणगीचे आवाहन करतात पण अपेक्षेएवढी देणगी जमली आहे आता कोणीही देणगी देऊ नये हे सांगत नाहीत।असा प्रकार फार पूर्वी नृसिंहवाडी व प.पू.श्री गुळवणी महाराज यांच्याबाबतीत घडलेला आहे।वाडीला मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर बांधकाम करण्याचा संकल्प श्री गुळवणी महाराजांनी सोडलेला होता व आपल्या शिष्यांना तसेच दत्तभक्तांना देणगीचे आवाहन केलेले होते।अपेक्षित रक्कम जमा झाली की श्री गुळवणी महाराजांनी देणगी स्वीकारणे थांबवले।आता असे काही घडताना दिसत नाही।बहुतेक सगळे जणांचे आने दो,आने दो असेच चाललेले असते।त्यामुळेच राजू गुरुजींचे वेगळेपण उठून दिसते।
श्री राजू गुरुजींच्या पाठीशी भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीमहाराज निश्चितच आहेत।त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की प्रत्यक्ष श्रीस्वामीच अंशावतार घेऊन राजू गुरुजींच्या रुपात आपल्याला प्राप्त झाले आहेत।कुरवपूरचे नवीन बांधकाम लवकरच पूर्णत्वास जाईल।आपण सर्व दत्तभक्तांनी आवर्जून कुरवपूर येथे येऊन भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीमहाराज यांच्या सेवेचा,दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतकृत्य करून घ्यावे।
सिद्धांत अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त
संकल्पना – श्री सचिन सराफ , श्री नरेश क्षीरसागर आणि भक्तगण
श्री राजू गुरूजी बद्दलचे हे मनोगत वाचून आनंद झाला. श्रीपाद स्वामींच्या पालखी रूमचे कार्य पूर्ण झाले आहे हे जाणुन समाधान वाटले. या दुर्लभ भाग्याच्या कार्यात माहिती नसल्या कारणाने सहभागी होता आले नाही याची खंत वाटते.
श्री राजू गुरुजींचे मनापासून अभिनंदन आणि आभार 🙏